राज्यात दहीहंडीचा मोठा जल्लोष; मुंबई-ठाण्यात थरांचा थरार
आज राज्यभरात श्रीकृष्ण जन्मोत्सव आणि दहीहंडी उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. विशेषतः मुंबई आणि ठाण्यात गोविंदा पथकांचा प्रचंड उत्साह पाहायला मिळत असून मानाच्या हंड्यांवर लाखो रुपयांच्या बक्षिसांची लयलूट झाली.
ठाण्यातील टेंभी नाक्याच्या दहीहंडीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हजेरी लावली, तर घाटकोपरमध्ये भाजप आमदार राम कदम यांच्या हंडीला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहिले. याशिवाय क्रिकेटपटू सूर्यकुमार यादव आणि बॉलिवूड अभिनेता संजय दत्त यांनीही विविध हंड्यांना भेट दिली.
दहीहंडी उत्सवाला गालबोट; मुंबईत दुर्घटना तर अनेक गोविंदा जखमी
मुंबईतील मालाड भागात दहीहंडी फोडताना एका ७ वर्षीय लहान गोविंदाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. याशिवाय मुंबई आणि पुणे परिसरातील विविध हंड्यांमध्ये मानवी मनोरे कोसळल्यामुळे दुपारी १२ वाजेपर्यंत २२ हून अधिक गोविंदा जखमी झाले असून त्यांच्यावर वेगवेगळ्या रुग्णालयांत उपचार सुरू आहेत. पुण्यातही हंडी संपल्यानंतर लोखंडी कमान काढताना रॉड अंगावर पडून एका महिलेचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे.
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; -एकनाथ शिंदे
आता गोविंदा स्पेनसारख्या देशांमध्येही पोहोचला असल्याचे सांगत,उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंतप्रधान मोदींच्या प्रेरणेने गोविंदा ऑलिम्पिकमध्ये गेला पाहिजे अशी महत्त्वाकांक्षा ठाणे येथील विजय चौगुले दहीहंडी उत्सवात व्यक्त केली.
गोविंदांच्या मानवी मनोऱ्यासाठी लागणारी मेहनत, सराव, जिद्द आणि एकजूट कौतुकास्पद असल्याचे शिंदेंनी नमूद केले. उपमुख्यमंत्री म्हणून केलेल्या कामांची माहिती देताना, त्यांनी दहीहंडीवरील निर्बंध हटवणे, गोविंदांना साहसी खेळाचा दर्जा देणे, लाखो गोविंदांसाठी विमा योजना सुरू करणे आणि सुट्टी जाहीर करणे या निर्णयांवर प्रकाश टाकला.

